Tuesday, March 2, 2021

प्राचीन कोल्हापूर...!!!

               पंचगंगेवरचा पूल ओलांडून कोल्हापूर शहरात प्रवेश करताना पुढे ज्या टेकडावर गाडीचा वेग मंदावतो ती टेकडी म्हणजे ब्रह्मपुरीची टेकडी. चिंचेच्या गर्द सावलीत टेकडी विसावलेली.

मूळ कोल्हापूर शहर ज्या ठिकाणी वसले होते,त्या ब्रह्मपुरी टेकडीवर
1944 ते 1947 या काळात झालेल्या उत्खननाचे छायाचित्र

 टेकडीच्या तोंडालाच एक चर्च, टोकावर बुहाणसाहेबाचा दर्गा. मधल्या जागेत पीरजादे, हकीम कुटुंबाची घरे. फकिरांची चाळ, बंगडे यांचा नावेचा कारखाना आणि तोरस्कर चौक ओलांडला की जुना बुधवार पेठ. शहराचा सर्वांत जुना म्हणजे किमान दोन हजार वर्षांपूर्वीचा हा परिसर. मूळ कोल्हापूर या परिसरातल्या टेकडीवरचं वसलेलं; पण काळाच्या ओघात आता टेकडीच्या उदरात दडून गेलेलं. ब्रह्मपुरी हेच मूळ कोल्हापूर याला खूप पुरावे. अनेक पुरावे उत्खननाच्या निमित्ताने प्रकाशात आलेले. भग्न वस्तूंच्या स्वरूपातले पुरावे इतके बोलके की, हा परिसर म्हणजे पंचगंगा नदीच्या काठावरचे दोन हजार वर्षांपूर्वीचे एक समृद्ध गाव होते याची साक्ष देणारे. ब्रह्मपुरी कधी वसली याचा नेमका पुरावा नाही; पण ब्रह्मपुरीचे अस्तित्व दोन हजार वर्षांपूर्वी होते हे स्पष्ट करणारे पुरावे असल्याने ब्रह्मपुरी हेच मूळ कोल्हापूर मानले जाते. याच टेकडीवर शहर का वसले याची कारणेही स्पष्ट आहेत. ब्रह्मपुरी पंचगंगा नदीच्या काठाला पण उंच टेकडीवर असल्याने पुराचा धोका नाही. ब्रह्मपुरीजवळ नदीला उतार असल्याने पावसाळ्यातले चार महिने वगळता नदी पायी ओलांडता येईल, अशी स्थिती होती. नदीच्या पलीकडे मुबलक शेतजमीन पसरली होती. त्यामुळे उदरनिर्वाहाची सोय होती. या परिसराला ब्रह्मपुरी म्हणून का ओळखले जाते याची स्पष्ट माहिती नाही; पण शिलाहार राजा गंडरादित्य याच्या कारकिर्दीतील एक शिलालेख उपलब्ध असून त्यात कोल्हापूरचा उल्लेख कोल्हापूर असून ब्रह्मपुरीत सूर्याचे एक मंदिर असल्याचे म्हटले आहे. या परिसरात १८७७ साली उत्खननाचा एक प्रयत्न झाला; पण त्यानंतर १९४४ ते ४७ या कालावधीत डॉ. एच. डी. सांकलिया व डॉ. एम. जी. दीक्षित यांनी स्टेट रिजन्सी कौन्सिलच्या साह्याने या परिसरात उत्खनन केले व के. बा. बा. महाराज यांनी या काळात त्यांना सहकार्य केले. टेकडीच्या उदरात दडलेल्या ब्रह्मपुरीचे वैभव उजेडात आले.या उत्खननाचा सारांश डॉ. साकलिया यांच्याच शब्दांत सांगायचा झाला तर इ. स. १०६ ते १३० च्या काळात सम्राट गौतमीपुत्र शातकर्णी किंवा सातवाहनाचे राज्य दक्षिणेत असताना पंचगंगा नदीच्या काठावर विटाच्या सुंदर बांधणीचे एक गाव होते. या गावाची उभारणी त्या शतकापूर्वीच्या काळातील असावी. व्यापार व संस्कृतीच्या दृष्टीने या गावाचा रोमन जगाशी चांगला संबंध होता. रोमहून आणलेल्या वस्तु, नाणी, धातूच्या भाड्यांचे अनुकरण मातीमध्ये केल्याचे आढळले. त्यानंतर म्हणजे इ.स. १३० नंतर हे गाव कधीतरी आगीत किंवा भूकंपाच्या धक्क्याने उद्ध्वस्त झाले व जमिनीत गाडले गेले. त्यानंतर नदीकाठची टेकडी असेच त्याचे स्वरूप राहिले. टेकडीवर बुन्हाणसाहेबाचा (पीर) दर्गा स्थापन झाला. मुसलमानी फौजेंचे ठाणे म्हणूनही टेकडीचा उपयोग झाला. १९७४ साली काही जागा ख्रिश्चन लोकांना देण्यात आली. १९०५ साली तेथे चर्च बांधले गेले. बुन्हाणसाहेबाच्या दर्याची देखभाल करणाऱ्या पीरजादे कुटुंबीयांनी या परिसरात होत जाणाऱ्या बदलाचे टप्पे अनुभवले. कारण टेकडीवर किती तरी वर्षे पीरजादे कुटुंबाचे एकच घर राहिले. १९४७ साली उत्खनन पूर्ण झाल्यानंतर हा परिसर पुरातत्त्व विभागाने संरक्षित म्हणून जाहीर केला.

छायाचित्र क्र.2

 उत्खननातील अनेक वस्तूंना देशभरातील पुरातन वस्तुसंग्रहालयात स्थान मिळाले. या ठिकाणी उत्खननात सापडलेली समुद्र देवता या मूर्तीची तर जागतिक स्तरावरील पुरातन वस्तूंच्या यादीत नोंद झाली. या मुक्या भग्न वस्तूंनीच कोल्हापूरची प्राचीनता स्पष्ट केली. त्या काळी ज्या नदीच्या पात्रातून वाट काढता येत होती, त्या पंचगंगा नदीचे पात्र बावड्याजवळ राजाराम बधारा बाधल्याने पाण्याने भरले आहे. त्यामुळे १८४७ साली नदीवर पूल बांधला गेला आहे. नदीकाठचे घाट, सुंदर मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. कोकणाकडे होणारी वाहतूक याच टेकडीवरील मार्गाने चालू आहे. त्यामुळे टेकडीच्या परिसरात आता सतत वर्दळ आहे. आज या परिसराचे स्वरूपच पालटले आहे. संरक्षित म्हणून घोषित केलेल्या टेकडीचीच खोदाई चालू झाली आहे. पूर्वी गाडल्या गेलेल्या घरांचे अवशेष या खोदाईच्या केळी डोकावतात; पण त्याचे महत्त्व कोणाला वाटत नाही. कारण या परिसरात मिळेल त्या जागी घरे बांधण्याची जणू मोहीमच सुरू आहे आणि गाडलेल्या मूळ गावावर अतिक्रमित वस्तीच्या भिंतीचे जणू एक नवे गावच उभे राहू लागले आहे.

No comments:

Post a Comment