Wednesday, March 17, 2021

तटबंदीतल कोल्हापूर..!!

                शहराभोवतीच्या तटबंदीचा घेर पावणेदोन मैल, उंची तीस फूट, रुंदी दहापासून सव्वीस फूट, तटबंदीवर ४५ बुरूज, तयभोवती खोल खंदक व तो पाण्याने भरलेला. तटाच्या आत येण्यास सहा वेशी. या वेशी ठराविक वेळेतंतर बंद, वेशी बंद झाल्या की, आत प्रवेश केवळ अपवादात्मक परिस्थितीतच, कोल्हापूर शहराभोवती १८८९ पर्यंत असलेल्या तटबंदीचे हे वर्णन, या तटबंदीच्या आत काही काळ शहर सुरक्षित राहिले. नंतर तटबंदीच्या आत शहर घुसमटले. तटबंदीच्या मर्यादिमुळे तटाबाहेरच जुळे शहर वसले व १८८९ नंतर तटबंदी पाडल्याने शहर ख-्या अर्थनि विस्तारले.१७८८ साली करवीर संस्थानची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापुरात आली. महालक्ष्मी मंदिराच्या परिसरातच वस्ती दाटीवाटीने झाल्याने राजवाड्याची जागाही त्याच परिसरात निवडली गेली. सुरक्षिततेचा भाग म्हणून शहराभोवती दगडी तट बांधला गेला. तटाचा विस्तारच सांगायचा झाला तर रविवार वेस (बिंदू चौक), विल्सन रोड (शिवाजी रोड), चांभार लाईन, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळवेस, तटाकड़ील तालीम, वरुणतीर्थ वेस, खरी कॉर्नर, मंगळवार वेस (मिरजकर तिकटी) ते परत रविवार वेस असा त्याचा घेरा राहिला. रविवार वेस, शनिवार वेस, मंगळवार वेस, वरुणतीर्थ वेस, गंगावेस, रंकाळवेस असे वेशीचे सहा दरवाजे राहिले. रविवार वेस म्हणजे सध्याचा बिंदू चौक. तेथे अजून तटबंदीचे अवशेष आहेत; पण तटाची कमान ही मूळ कमान नव्हे. आता असलेल्या कमानीशेजारी मुजवलेली जी कमान आहे ती प्रवेशद्वाराची मूळ कमान, शनिवार वेस म्हणजे शिवाजी पुतळा ते पापाची तिकटीचा परिसर. वरुणतीर्थ वेस अर्ध्या शिवाजी पुतळ्यासमोर मारुतीचे मंदिर आहे त्या शेजारी व मंगळवार वेस मिरजकर तिकटीला.

भाऊसिंगजी रोड,कोल्हापूर


रविवार वेशीजवळच जुना तुरुंग. या वेशीच्या समोरील खंदकात एका टेकडावर शेषशायी विष्णूचे मंदिर, हे मंदिर हलवून त्यातील शेषशायीची मूर्ती आता मिरजकर तिकटीला एका मंदिरात आहे व मूळ मंदिर ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी कैद्यासाठी भाजीपाल्याची लागवड केली आहे, आळूची बाग म्हणूनही हा भाग परिचित आहे. या ठिकाणी असलेल्या एका बुरुजावर धोकादायक कैद्यांसाठी अंधार कोठडी व त्यापुढील बुरुजावर म्हणजे बालगोपालच्या पिछाडीस खोडा घातलेल्या कैद्यांसाठीची जागा आहे. खोडा म्हणजे हातापायात बेड्या व हात मागे बांधलेले. यापैकी एक बुरूज आता ढासळला आहे. आता हा बुरूज म्हणजे पतंग उडविण्यासाठीची सार्वजनिक जागा आहे. या बुरुजामागे बाराईमाम दैवताचे एक स्थान चक्क कारागृहाच्या आवारात आहे.


शनिवार वेस ते रविवार वेस या परिसरात जो खंदक होता, त्यात आठवडा बाजार भरत असे. असाच बाजार कपिलतीर्थाच्या परिसरात एका पत्र्याचे छप्पर असलेल्या शेडमध्ये भरत होता. विल्सन पुलाजवळ (शिवाजी चौक)

खंदकातही बाजार भरत होता. कर्नल फेरीसने तेथे नियोजनपूर्वक मंडई बांधली. फेरीस मार्केट असेच या मंडईला नाव दिले गेले. या मार्केटच्या प्रवेशद्वारावर एक सुंदर दगडी कमान उभी करण्यात आली. अलीकडे हे मार्केट पाडून तेथे शिवाजी मार्केटची इमारत उभी करण्यात आली व फेरीस मार्केटची दगडी कमान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभी करण्यात आली. या कमानीवर अजूनही फेरीस मार्केटच्या अनावरणाचा संगमरवरी फलक आहे.

पंचगंगा घाट

तटबंदीच्या आत कपिलतीर्थ, खंबाळा, सेजाळ तळे, इंद्रकुंड, काशी मनकर्णिका कुंड ही तळी होती, तर राजवाड्यासभोवती कागलकर, राजाज्ञा, खड्डेकर, हिम्मतबहाहर चव्हाण गुरू महाराज, यादव, पाटणकर, जीववा नाना जाधव, भाऊमहाराज, पारसनीस, जोशीराव, नागपूरकर यांचे वाडे होते. याशिवाय कलावंतीणीची आळी (कसबा गेट ते गंगावेस), कुंभार गल्ली, पाटील आळी, बाबूजमाल, खंबाळा, मोमीन गल्ली, सुतार आळी, गुरव गल्ली, देशपांडे गल्ली, अवचितपीर, खरी गल्ली, रंकोबा मंदिर, कसबेकर वाडा, भाऊ नाईक, माने, गावकामगार पाटील, कुंभोजकरवाडा, आयरेकर गल्ली, चव्हाण पाटणकर, राजापूरकर आळी, मिठारी बोळ, फडणीस बोळ, भेंडे गल्ली, हुजूर गल्ली, पटवेगार व जिनगर गल्ली, फडनाईक, पानारी, सुतार, हकीम, नालबंद आळी, म्हेतर, माळी, आळी, पत्की बोळ, ब्राह्मणपुरी, बागणीकर वाडा, आझाद गल्ली, खाडे वाडा, खाटीक गल्ली, ओतारी आळी, परीट गल्ली अशी वस्ती होती. मिरजकर तिकटीच्या विठ्ठल मंदिरात धर्मशाळा होती.


तटबंदीबाहेर पद्माळा, शेरीबाग (जयप्रभासमोरचा भाग), बेलबाग, खासबाग, चौफाळे माळ (दसरा चौक), मीराबाग, जीवबा नाना जाधवांची बाग, सरकारी बाग, नर्सरी, देवगिरी मठ, लालगिरी बाग, धोत्री बाग, हत्तीमहाल, बावडेकर बाग, हत्ती बाग (पद्माळा) इनामदार बाग (बाबूजमालजवळ), शिगोशी तलाव, भंगी आळी, खुळ्याची चावडी, उपाध्ये बुवा बोळ, खर्डेकर बाग, आंबी (नावाडी) वसाहत, परीट, शिपी, कुंभार, तेली, वाणी, न्हावी, वडार, लोणार, कलकुटकी, गवळी गोसावी यांची वस्ती होती. तटाच्या आत तर इतकी दाट वस्ती होती की, तटबंदीच्या आतले शहर म्हणजे रोगराईची खाण मानले जात होते. संस्थानचे कारभारी दाजी कृष्णा पंडित यांनी कोल्हापूर हे दक्षिण काशी म्हणून काशीतल्या गल्ली-बोळासारखे दगडी फरशीचे रस्ते बहुतेक ठिकाणी केले होते. अजूनही काही भागांतील छोट्या बोळांत हे फरशीचे रस्ते आहेत. बहुतेक घरे एकमजली खापऱ्याची होती. सांडपाण्याची निर्गत करण्याची सोय नव्हती. बुट्टीचे संडास होते. सांडपाणी दारात सोडायचे व ती घाण झाकण्यासाठी त्यात कर्दळी किंवा आळू लावायची प्रथा होती.


Tuesday, March 2, 2021

प्राचीन कोल्हापूर...!!!

               पंचगंगेवरचा पूल ओलांडून कोल्हापूर शहरात प्रवेश करताना पुढे ज्या टेकडावर गाडीचा वेग मंदावतो ती टेकडी म्हणजे ब्रह्मपुरीची टेकडी. चिंचेच्या गर्द सावलीत टेकडी विसावलेली.

मूळ कोल्हापूर शहर ज्या ठिकाणी वसले होते,त्या ब्रह्मपुरी टेकडीवर
1944 ते 1947 या काळात झालेल्या उत्खननाचे छायाचित्र

 टेकडीच्या तोंडालाच एक चर्च, टोकावर बुहाणसाहेबाचा दर्गा. मधल्या जागेत पीरजादे, हकीम कुटुंबाची घरे. फकिरांची चाळ, बंगडे यांचा नावेचा कारखाना आणि तोरस्कर चौक ओलांडला की जुना बुधवार पेठ. शहराचा सर्वांत जुना म्हणजे किमान दोन हजार वर्षांपूर्वीचा हा परिसर. मूळ कोल्हापूर या परिसरातल्या टेकडीवरचं वसलेलं; पण काळाच्या ओघात आता टेकडीच्या उदरात दडून गेलेलं. ब्रह्मपुरी हेच मूळ कोल्हापूर याला खूप पुरावे. अनेक पुरावे उत्खननाच्या निमित्ताने प्रकाशात आलेले. भग्न वस्तूंच्या स्वरूपातले पुरावे इतके बोलके की, हा परिसर म्हणजे पंचगंगा नदीच्या काठावरचे दोन हजार वर्षांपूर्वीचे एक समृद्ध गाव होते याची साक्ष देणारे. ब्रह्मपुरी कधी वसली याचा नेमका पुरावा नाही; पण ब्रह्मपुरीचे अस्तित्व दोन हजार वर्षांपूर्वी होते हे स्पष्ट करणारे पुरावे असल्याने ब्रह्मपुरी हेच मूळ कोल्हापूर मानले जाते. याच टेकडीवर शहर का वसले याची कारणेही स्पष्ट आहेत. ब्रह्मपुरी पंचगंगा नदीच्या काठाला पण उंच टेकडीवर असल्याने पुराचा धोका नाही. ब्रह्मपुरीजवळ नदीला उतार असल्याने पावसाळ्यातले चार महिने वगळता नदी पायी ओलांडता येईल, अशी स्थिती होती. नदीच्या पलीकडे मुबलक शेतजमीन पसरली होती. त्यामुळे उदरनिर्वाहाची सोय होती. या परिसराला ब्रह्मपुरी म्हणून का ओळखले जाते याची स्पष्ट माहिती नाही; पण शिलाहार राजा गंडरादित्य याच्या कारकिर्दीतील एक शिलालेख उपलब्ध असून त्यात कोल्हापूरचा उल्लेख कोल्हापूर असून ब्रह्मपुरीत सूर्याचे एक मंदिर असल्याचे म्हटले आहे. या परिसरात १८७७ साली उत्खननाचा एक प्रयत्न झाला; पण त्यानंतर १९४४ ते ४७ या कालावधीत डॉ. एच. डी. सांकलिया व डॉ. एम. जी. दीक्षित यांनी स्टेट रिजन्सी कौन्सिलच्या साह्याने या परिसरात उत्खनन केले व के. बा. बा. महाराज यांनी या काळात त्यांना सहकार्य केले. टेकडीच्या उदरात दडलेल्या ब्रह्मपुरीचे वैभव उजेडात आले.या उत्खननाचा सारांश डॉ. साकलिया यांच्याच शब्दांत सांगायचा झाला तर इ. स. १०६ ते १३० च्या काळात सम्राट गौतमीपुत्र शातकर्णी किंवा सातवाहनाचे राज्य दक्षिणेत असताना पंचगंगा नदीच्या काठावर विटाच्या सुंदर बांधणीचे एक गाव होते. या गावाची उभारणी त्या शतकापूर्वीच्या काळातील असावी. व्यापार व संस्कृतीच्या दृष्टीने या गावाचा रोमन जगाशी चांगला संबंध होता. रोमहून आणलेल्या वस्तु, नाणी, धातूच्या भाड्यांचे अनुकरण मातीमध्ये केल्याचे आढळले. त्यानंतर म्हणजे इ.स. १३० नंतर हे गाव कधीतरी आगीत किंवा भूकंपाच्या धक्क्याने उद्ध्वस्त झाले व जमिनीत गाडले गेले. त्यानंतर नदीकाठची टेकडी असेच त्याचे स्वरूप राहिले. टेकडीवर बुन्हाणसाहेबाचा (पीर) दर्गा स्थापन झाला. मुसलमानी फौजेंचे ठाणे म्हणूनही टेकडीचा उपयोग झाला. १९७४ साली काही जागा ख्रिश्चन लोकांना देण्यात आली. १९०५ साली तेथे चर्च बांधले गेले. बुन्हाणसाहेबाच्या दर्याची देखभाल करणाऱ्या पीरजादे कुटुंबीयांनी या परिसरात होत जाणाऱ्या बदलाचे टप्पे अनुभवले. कारण टेकडीवर किती तरी वर्षे पीरजादे कुटुंबाचे एकच घर राहिले. १९४७ साली उत्खनन पूर्ण झाल्यानंतर हा परिसर पुरातत्त्व विभागाने संरक्षित म्हणून जाहीर केला.

छायाचित्र क्र.2

 उत्खननातील अनेक वस्तूंना देशभरातील पुरातन वस्तुसंग्रहालयात स्थान मिळाले. या ठिकाणी उत्खननात सापडलेली समुद्र देवता या मूर्तीची तर जागतिक स्तरावरील पुरातन वस्तूंच्या यादीत नोंद झाली. या मुक्या भग्न वस्तूंनीच कोल्हापूरची प्राचीनता स्पष्ट केली. त्या काळी ज्या नदीच्या पात्रातून वाट काढता येत होती, त्या पंचगंगा नदीचे पात्र बावड्याजवळ राजाराम बधारा बाधल्याने पाण्याने भरले आहे. त्यामुळे १८४७ साली नदीवर पूल बांधला गेला आहे. नदीकाठचे घाट, सुंदर मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. कोकणाकडे होणारी वाहतूक याच टेकडीवरील मार्गाने चालू आहे. त्यामुळे टेकडीच्या परिसरात आता सतत वर्दळ आहे. आज या परिसराचे स्वरूपच पालटले आहे. संरक्षित म्हणून घोषित केलेल्या टेकडीचीच खोदाई चालू झाली आहे. पूर्वी गाडल्या गेलेल्या घरांचे अवशेष या खोदाईच्या केळी डोकावतात; पण त्याचे महत्त्व कोणाला वाटत नाही. कारण या परिसरात मिळेल त्या जागी घरे बांधण्याची जणू मोहीमच सुरू आहे आणि गाडलेल्या मूळ गावावर अतिक्रमित वस्तीच्या भिंतीचे जणू एक नवे गावच उभे राहू लागले आहे.